नाशिक लाईव्ह न्यूज । वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावरील निर्यात शुल्क १ एप्रिल शून्य करण्याचे परिपत्रक काढल्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला शेतकऱ्यांच्या कांद्याला किती भाव मिळणार, याकडे जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कांद्याला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा असल्याने शेतकरी वर्गात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
खरीप हंगामातील लाल कांद्याला चांगला दर मिळाला असताना, रब्बी हंगामातील उन्हाळा कांदा कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल विकला जाणारा कांदा ११०० ते १२०० रुपयांनी विकला जाऊ लागला होता.
शेतकऱ्यांचा कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. याचे पडसाद विधानसभेत आणि लोकसभेच्या अधिवेशनातही उमटले होते. सर्वाधिक कांदा उत्पादन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी आपापल्या अधिवेशनात कांद्याच्या प्रश्नावर आवाज उठविला आणि कांदा निर्यात शुल्क कमी करण्याची सरकारला विनंती केली होती. त्यानुसार वाणिज्य मंत्रालयाने दखल घेऊन दि. १ एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क शून्य करण्याचा परिपत्रक जारी केले होते. आठ दिवसांपूर्वी असे परिपत्रक आलेले असल्याने आता सर्वांचे लक्ष १ एप्रिल रोजी होणाऱ्या कांदा खरेदीकडे लागून आहे.