नाशिक लाईव्ह न्यूज । २९ मे २०२५ । नाशिकमध्ये खुनाच्या घटना सातत्याने समोर येत असून यामुळे शहरातील कायदा सुवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थितीत होत आहे. याच दरम्यान नाशिकमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
बाजारात वडिलांसोबत भाजी खरेदी करण्यास गेलेल्या १९ वर्षीय तरुणावर चार जणांच्या टोळीने चाकूने वार करून खून केल्याची घटना दि. २८ भाजी पटांगण परिसरात रात्री साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान घडली. नंदलाल उर्फ सूरज जगत दास (रा. सीतागुंफा, पंचवटी) असे खून झालेल्या मुलाचे नाव नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पेंटिंगकाम करत असलेला सूरज रात्री कामावरून आल्यानंतर उशिराने वडिलांसोबत भाजी खरेदी करण्यासाठी गेला होता. वडील भाजी खरेदी करत असताना सूरज गाडगे महाराज पुलाखाली सुलभ शौचालयाजवळ उभा होता. तो एकटा उभा असताना त्याच्याजवळ चार अल्पवयीन मुले आली. त्यांनी सूरजकडे पैशांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी सूरजला मारायला सुरुवात केली. त्याचवेळी सूरजच्या पोटात त्यांनी डाव्या बाजूला चाकू खुपसला. गंभीर जखमी अवस्थेत तो खाली कोसळला.
नागरिकांनी आणि वडिलांनी त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने एक संशयित ताब्यात घेतला असून इतरांचा शोध सुरू आहे. संशयित अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.