नाशिक लाईव्ह न्यूज । १४ मे २०२५ । मे महिन्यात सर्वाधिक उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. परंतु यंदा मे महिना आतापर्यंतचा सर्वात थंड महिना म्हणून समोर येत आहे. मागच्या काही दिवसापासून राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा सुरु आहे. ऐन उन्हाळ्यात अतिवृष्टीसारख्या स्थितीला तोंड द्यावे लागत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान , नाशिक जिल्ह्यात देखील अवकाळीने धुमाकूळ घातला असून यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला १७ मे पर्यंत पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले.
खरतर गेल्या महिन्यात नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढला होता. वाढत्या उष्णतेमुळे नाशिककर हैराण झाला होता. मात्र मे महिण्यात हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. नाशिक जिल्ह्याला सुरुवातीला ७ मेपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानंतर १२ मेपर्यंत यलो अलर्ट दिला गेला. आता त्यात आणखी वाढ करून १७ मेपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. १३ ते १७ मेपर्यंत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि ३० ते ४० प्रतितास वेगाने साेसायट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्याती घाटमाथ परिसरातही काहीसे असेच चित्र राहणार आहे. तर १७ मे रोजी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान काल मंगळवारी घाटमाथ्यावरील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह नाशिक शहर व आसपासच्या भागात त्याने पुन्हा हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे लोट वहात होते. सखल भागातील अनेक चौक व रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आल्याने वाहतुकीत अडथळे आले. यादरम्यान वादळामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळली.
मान्सून अंदमानात दाखल
मान्सून अंदमानात दाखल झाला असून, लवकरच केरळमार्गे तळकोकणातून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार आहे. हवामान विभागाच्या मते, ५ जून रोजी मान्सून तळकोकणामार्गे महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ऐकीकडे अवकाळी पावसाचा १७ मेपर्यंत अलर्ट देण्यात आल्याने, पावसाळा सुरू होईपर्यंत अवकाळीचा तडाखा कायम राहणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.