नाशिक लाईव्ह न्यूज । गहू पिकावर टाकण्यासाठी असलेले तणनाशक कांदा पिकावर फवारल्याने नाशिक जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. यातून पीक हातचे गेले आहे. संबंधित तणनाशक औषधाचा साठा सील करण्याचे आदेश कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान कसे भरून निघणार, हा प्रश्न आहे.
पहिलेच कांद्याचे दर प्रचंड घसरल्याने नवीन हाती येत असलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. लाल कांद्याला मंगळवारी (दि.२८) कमीतकमी ७०१ व सर्वसाधारण केवळ १९०० रुपयांचा भाव मिळाला. कांद्याचे भाव गडगडले असताना चुकीच्या तणनाशक फवारणीमुळे शेतकरी सर्वच बाजूंनी घेरला गेला
कांदा पिकावर जे तणनाशक फवारले गेले त्यात काही दोष आहे का, याचीही तपासणी करण्यासाठी औषधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल तीन दिवसांत येईल. त्यानंतर कंपनी आपली भूमिका मांडेल. कृषी दुकानदारांनी गव्हासाठीचे तणनाशक चुकीच्या पद्धतीने कांदा पिकासाठी दिले असेल तर संबंधित दुकानदारांवरही कारवाई करणार असल्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी सांगितले.
कांदा पिकावर गव्हासाठीचे तणनाशक ही चूक कंपनी किंवा कृषी दुकानदारांची असल्याचे या प्रकरणात शासन नुकसान भरपाई देऊ शकत नाही. कंपनीच भरपाई देईल, असेदेखील कृषिमंत्री कोकाटे यांनी नमूद केलं आहे.