नाशिक लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२५ । नाशिकसह राज्यभरात उन्हाच्या झळा वाढू लागल्या असून दुसरीकडे जलसंकटही वाढताना दिसत आहे. दिंडोरी तालुक्यातील धरणांतील उपयुक्त जलसाठा केवळ 50 टक्क्यांवर आला आहे. उपलब्ध जलसाठ्याचा योग्य वापर न केल्यास आगामी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक धरणांत मुबलक साठा तयार झाला होता. यामुळे पाण्याची चिंता कमी झाली होती. परंतु मात्र, डिसेंबर व जानेवारी महिन्यांत जलसाठा झपाट्याने कमी झाला. नोव्हेंबर अखेरीस तुडुंब भरलेले प्रकल्प मार्चमध्ये निम्मेच राहिले आहेत.
दिंडोरी तालुका हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, दरवर्षी स्थानिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सद्यस्थितीत असलेला उपलब्ध जलसाठा संरक्षित केल्यास मे अखेरीस पाणीटंचाईचे संकट उद्भवणार नाही.दुसरीकडे पुणेगाव धरणात ४७, वाघाड धरणात ४२, तर पालखेड धरणात केवळ ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अवघ्या तीन महिन्यांत प्रकल्पातील पाणी निम्म्यावर आले आहे.
त्यामुळे उर्वरित चार महिने हा साठा जपून वापरण्याची गरज आहे. उपलब्ध जलसाठ्याचा योग्य वापर न केल्यास आगामी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने प्रकल्पातील उपलब्ध पाणी प्रामुख्याने पिण्यासाठी राखीव ठेवण्याची आवश्यकता आहे. जर पाण्याची चोरी झाली, तर एप्रिल महिन्यापासूनच प्रकल्पालगतच्या गावांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसू शकतो.
विहिरींनी गाठला तळ
दुष्काळाच्या काळातही परिसरातील विहिरींनी एप्रिलपर्यंत तळ गाठला नव्हता. मात्र, यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानेही फेब्रुवारी-मार्चमध्येच विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याची योग्य साठवणूक न होणे. यामुळे प्रशासनाने त्वरित योग्य उपाययोजना आखणे आवश्यक आहे. नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि जलसंधारणावर भर द्यावा. अन्यथा येत्या महिन्यांत पाणीटंचाईचे संकट अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.