नाशिक लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । हवामान खात्यानं राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. नाशिकमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असून यानंतर आज मनमाड आणि पानेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवली.
हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी संकट घेऊन आला आहे. पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे.तर कांदा बियाण्यालाही मोठा फटका बसला आहे.यासोबतच आंबा बागांमधील फळांचे देखील नुकसान झाले आहे.शेतकरी आधीच उत्पादन खर्चात वाढ, बाजारभावाची अनिश्चितता यामुळे चिंतेत असतात.
त्यातच निसर्गाच्या या आणखी एका तडाख्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी वर्गातून होत आहे.