नाशिक लाईव्ह न्यूज । १६ मे २०२५ । मागच्या काही दिवसापासून नाशिक शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. अवकाळी पावसामुळे मे महिन्यातच पावसाळ्याचे वातावरण तयार होत आहे. जिल्ह्यात या अवकाळी पावसाचे सावट अद्याप काही दिवस कायम राहणार आहे. हवामान खात्याने आगामी दोन दिवस पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
यादरम्यान, नाशिक जिल्ह्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी 40 ते 50 किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे.दरम्यान मागच्या काही दिवसात झालेल्या अवकाळीमुळे जिल्ह्यातील सुमारे तीन हजार 868 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नाशिक, बागलाण, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, देवळा आदी तालुके अवकाळीने प्रभावित झाले आहेत. शेती पिकांसह, आंबा, कांदा, डाळिंब, द्राक्षांसह काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
अवकाळीने पावसामुळे घरांचेही नुकसान झाले असून 300 हून अधिक घरांची पडझड झाली आहे. पेठ तालुक्यात सर्वाधिक 101 घरे बाधित झाली तर कळवणमध्ये 59, बागलाणमध्ये 22, मालेगावमध्ये 21 घरांचे नुकसान झाले. आज आणि उद्यापर्यंत अवकाळीचा मुक्काम वाढला आहे.
आज राज्यातील या जिल्ह्यात अवकाळीचा इशारा
हवामान खात्याने राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना आजपासून पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.