नाशिक लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । मागच्या काही दिवसापासून उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या नाशिककरांना आगामी काही दिवस उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण हवामान खात्याने नाशिकसह राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यादरम्यान काही ठिकाणी वादळी वारे अन् गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. नाशिकला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज कुठंकुठं कोसळणार अवकाळी पाऊस?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरणासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली येथे जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर नाशिकसह पालघर, ठाणे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये १० तारखेपर्यंत अवकाळीचे ढग
नाशिक शहरासह जिल्ह्यात येत्या १० तारखेपर्यंत अवकाळी पावसाचे ढंग दाटून येण्याची शक्यता वर्तविली जात असताना आता बुधवारपर्यंत (दि. ७) गारपिटीचाही धोका ओढावू शकतो, असा अंदाज हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. छत्तीसगडवर आवर्ती व अरबी समुद्रात दीड किमी उंचीपर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे फिरणाऱ्या प्रत्यावर्ती अशा दोन्ही चक्रीय वाऱ्यांच्या संगमातून महाराष्ट्रात गारपिटीचा धोका निर्माण झाल्याचे खुळे यांनी सांगितले.
दरम्यान नाशिक शहर व परिसरात उन्हाच्या झळांच्या तीव्रता रविवारी (दि. ४) बऱ्यापैकी कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना आला. कमाल तापमान थेट ३५.७ अंशांपर्यंत घसरल्याची नोंद करण्यात आली. तसेच किमान तापमान २०.६अंश इतके नोंदविण्यात आले. यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.