नाशिक लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२५ । सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूर पेटले. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत सोमवारी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यातील विविध ठिकाणी आंदोलनं केली. मात्र याच दरम्यान रात्री नागपूरच्या महाल भागात दोन गटात जोरदार राडा झाला. दोन गटातील दगडफेक, हिंसाचारात तीन पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसह 35 जण जखमी झाले आहेत.
यावेळी काही जणांनी दुचाकी चार चाकी वाहनांसह दुकांची तोडफोड करत मोठे नुकसान केले. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. त्यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काही प्रत्यक्षदर्शींनी घटनेचा थरारक अनुभव सांगितला आहे.
धारदार शस्त्रे आणि जाळपोळ
नागपुरातील हंसापुरी भागातील एका प्रत्यक्षदर्शी स्थानिक महिलेनं घटनेदरम्यान नेमकं काय घडलं याची माहिती दिली. ‘जवळपास ३० ते ३५ लोक आपल्या चेहऱ्यावर स्कार्फ बांधून आले होते. त्यांनी आपला चेहरा पूर्णपणे झाकला होता. त्यांच्या हातात धारदार शस्त्र होती. ते एकमेकांवर हल्ला करत होते. काहींच्या हातात धारदार शस्त्र, स्टिक्स आणि बाटल्या होत्या.
जमावाने एकदम गोंधळ सुरू केला. काही ठिकाणी आग लावली. धारदार शस्त्रांनी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. दुकानांची तोडफोड केली. यावेळी दुकानं बंद करण्यास सांगितले होते. त्यामुळे दुकानांचे फार नुकसान झाले नाही. मात्र, वाहनांचे नुकसान झाले आहे’.
हंसापुरी भागातील एक दुकानदारानं सांगितले की, ‘रात्री १०:३० वाजता मी दुकान बंद केले. काही लोक अचानक आले आणि त्यांनी वाहनांना पेटवण्यास सुरूवात केली. मी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्यावर काही लोकांनी दगडफेक केली. माझ्या दोन गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे’. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शांतता राखण्याचे आवाहन केलं होतं. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.