नाशिक लाईव्ह न्यूज । ९ मे २०२५ । गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी झालेल्या वादळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठं नुकसान झाले आहे. दुसरीकडे पावसामुळे तापमानात मोठी घसरण झाल्याने उकाड्यातून दिलासा मिळाला आहे. दरम्यान राज्यावर अवकाळी पावसाने सावट कायम असून आजही १४ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज नाशिकसह नंदुरबार, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात ८ दिवसांत सरासरी ८.५ मिमी पाऊस
अवकाळी पावसाने जिल्हाभरात आठ दिवसात हजेरी लावली आहे. १५ तालुक्यांमध्ये सरासरी ८.५ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक २०.६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्याचा १७६७.२५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.
तापमानात मोठी घसरण
दरम्यान अवकाळी पावसामुळे नाशिकच्या तापमानात मोठी घसरण झाली आहे. काही दिवसापासून चाळीशीवर गेलेला पारा बराच खाली आला. गुरुवारी नाशिकचे तापमान ३० अंशापर्यंत होते. सकाळी व रात्री हवेत गारवा जाणवू लागला आहे. तापमानात घसरण झाल्याने नाशिककरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.