नाशिक लाईव्ह न्यूज । १९ मे २०२५ । नाशिक शहरासह जिल्ह्यात मागच्या बारा दिवसापासून बेमोसमी पाऊस हजेरी लावत आहे. अनेक वर्षांनंतर मे महिन्यात इतका पाऊस झाल्याने शेती पिकांना फटका बसला आहे. अजूनपर्यंत पाऊस सुरु असून पुढील काही दिवसात देखील अवकाळीचा शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात मागील बारा दिवसात थैमान घातले आहे. यामुळे तब्बल साडेपाच हजार हेक्टरवरील पिकांची माती झाली असून अनेक वर्षांनंतर मे महिन्यात पिकांना अवकाळीचा इतका मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात अजूनही दररोज अवकाळी पाऊस कहर करत असल्याने नुकसानीचा आकडा वाढू शकतो. सर्वाधिक फटका कांदा, भाजीपाला व आंबा पिकाला बसला आहे. तर, द्राक्षाचे देखील नुकसान झाले आहे. मात्र अवकाळी पाऊस थांबायचे नाव घेत नसल्यानं नुकसानग्रस्त पिकांचा आकडा रोजच वाढत आहे.
विजाच्या कडकडाटाने दोन हजार कोंबड्यांचा मृत्यू
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु येथील शेतकरी नाना मोरे यांच्या पोल्ट्रीफॉर्म मधील दोन हजार कोंबड्या रात्रीच्या विजाच्या कडकडाच्या आवाजाने मरण पावल्या आहेत. त्यामुळे मोरे यांचे लाखोचे नुकसान झाले. या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करावे; अशी मागणी शेतकरी मोरे यांनी केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मनमाड व बाजूच्या परिसरात मध्यरात्रीपासून विजांचा प्रचंड गडगडटासह जोरदार पाऊस झाल्याने पांझन नदी जोरदार वाहू लागली आहे. तर काल संध्याकाळच्या सुमारास येवला तालुक्यातील जळगाव- नेउर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले, ते थेट शेतातील विहिरीच्या कठड्याला लागल्याने विहिरींना पाणी उतरण्यास मदत होणार आहे.