नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमधील लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याचे दर खालावले असून सरासरी दर केवळ हजार रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत. बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळेही निर्यातीत घट झाली आहे. यासह गतवर्षीच्या तुलनेत बांगलादेशात यंदा ३० टक्के अधिक उत्पादन होणार असल्यामुळे जूनपर्यंत बांगलादेश त्यांची स्वतःची गरज भागवू शकणार आहे. यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने त्याचा फटका कांदा उत्पादकांना बसला आहे.
एकीकडे नाफेड एनसीसीएफकडून खरेदीला अद्याप सुरुवात झालेली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला किमान ५००, कमाल १५५५ तर सरासरी १००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाले, उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांद्याची निर्यात ठप्प झाल्याने स्थानिक बाजारपेठांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. याच कारणामुळे कांद्याचे दर घसरत असल्याचे कांदा निर्यातदारांचे म्हणणे आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने घुमाकूळ घातल्याने काढणीला आलेल्या उन्हाळ कांद्याला पाणी लागल्याने मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादकांचे नुकसान होत आहे. एकीकडे कांद्याला भाव नाही. दुसरीकडे अवकाळी पावसाचा फटका अशा दुहेरी संकटांतून शेतकरी जात आहे.
निसर्गाच्या संकटाची भर
गेल्या आठवड्यापासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने नुकसान केले आहे. काढणीला आलेला उन्हाळ कांदा पावसात भिजल्याने सडून जाण्याची शक्यता वाढली आहे. याचा अर्थ असा की, शेतकरी ना तो कांदा विकू शकतात, ना साठवू शकतात. त्यामुळे आर्थिक नुकसान अजून वाढत आहे.
जागतिक घटकांचा फटका कांदा निर्यातीसाठी बांगलादेश ही एक मोठी बाजारपेठ आहे. मात्र, सध्या तेथील राजकीय अस्थिरतेमुळे निर्यात ८० टक्क्यांपर्यंत घटली आहे. शिवाय, तेथे यंदा ३० टक्के जास्त कांदा उत्पादन झाल्याने जूनपर्यंत ते स्वयंपूर्ण असतील. त्यामुळे भारतातून निर्यात होण्याची शक्यता अत्यल्प आहे. दुसरीकडे, भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे तिथल्या व्यापार मार्गावर मर्यादा आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय मागणीवर परिणाम करणाऱ्या या दोन्हीही घटकांमुळे निर्यातदार व्यापाऱ्यांकडून कांद्याची मागणी घटली आहे