नाशिक लाईव्ह न्यूज । राज्यातील महायुतीच्या नेत्यांमधील नाराजी वेळोवेळी दिसून येत असून अशातच आता नाशिकमधील देवळाली (Deolali) मतदारसंघामधील पाणीपुरवठा योजनेवरून शिवसेना (Shiv Sena) -राष्ट्रवादी (NCP) आमनेसामने आले आहेत.
भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा राष्ट्रवादीमुळे पूर्ण झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला होता. यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी आमदार सरोज अहिरे यांच्यावर टीका केली. ही पाणीपुरवठा योजना आपल्याच पाठपुराव्यामुळे मंजूर झाली, असा दावा करत सरोज अहिरे यांनी श्रेय लाटलं. परंतु आमच्या पाठपुराव्यामुळेच ही योजना मंजूर झाली होती असा, दावा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय करंजकर यांनी केलाय.
याच पाणीपुरवठा योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची ठिणगी पडलीय. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या दौऱ्याच्या दोन दिवस अगोदरच नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगूरला आपण पाणीपुरवठा योजना दिल्याचं सभेत जाहीर केलं होतं.
पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचे शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केला होता. मला अनेक प्रकारचा त्रास झाला आहे, माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरूय. आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो, पण मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा, असं सरोज म्हणाल्या. तुम्ही भगूरमध्ये तुम्ही काम करू नका, असं मला सांगितलं जातं, असंही सरोज म्हणाल्या. यानंतर अजित पवारांनी देखील सरोज अहिरे यांची पाठराखण केली होती.