नाशिक लाईव्ह न्यूज । तुम्हाला रेशन हवे असेल तर इ-केवायसी (EKYC) करावीच लागेल असे वारंवार सांगूनही नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) तब्बल २ हजार १७५ लाभाथींनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर या कार्डधारकांचे आता रेशन (Ration Card) बंद केले जाणार आहे. तसा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
त्यामुळे आता या कार्डधारकांना इ-केवायसी करावीच लागेल, अन्यथा रेशन धान्यापासून वंचित रहावे लागेल. कोरोनात मोफत धान्य वितरणाचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अद्यापही कायम असून लोकसभा निवडणुकीपूर्वीच शासनाने हे मोफतचे धान्य थेट २०२९ पर्यंत दिले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु मोफत धान्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीना त्यांचे आधारकार्ड हे रेशनकार्डशी जोडणे (इ-केवायसी) अनिवार्य करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पंधरा तालुके तसेच नाशिक व मालेगाव धान्य वितरण अधिकारी मिळून एकूण ८ लाख ८८ हजार ३३१ रेशनकार्ड नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये अंतोदय व प्राधान्य रेशनकार्डधारकांचा समावेश आहे. लाभार्थीची एकूण संख्या ३८ लाख ४३ हजार ६७४ इतकी आहे, त्यापैकी ३८ लाख ४९ हजार ४९९ लाभार्थीचे इ-केवायसी पूर्ण झाले असून हे प्रमाण ९९.९४ टक्के आहे. शंभर टक्के इ-केवायसी पूर्ण केलेल्या तालुक्यांमध्ये देवळा, कळवण, मालेगाव व पेठ या तालुक्यांचा समावेश असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी सांगितले.