नाशिक लाईव्ह न्यूज । एकीकडे शेतकरी वर्ग रब्बी हंगामातील पिके काढण्यात व्यस्त आहे. मात्र यातच बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागांमध्ये पुढील दोन दिवसांत पावसाचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांचं टेंशन वाढलं आहे.
राज्यात कुठे कोसळणार पाऊस?
हवामान खात्याने चक्रीवादळामुळे २१ आणि २२ फेब्रुवारीला राज्यातील मराठवाड्यासह विदर्भात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. मात्र इतर राज्यात आगामी तीन दिवस हवामान कोरडे राहणार असून उन्हाची तीव्रताही कायम राहील. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे.
नाशिकमध्ये तापमानात वाढ
नाशिकमध्ये दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसत आहे. यामुळे उन्हाचा चांगलाच तडाखा वाढला आहे. जिल्ह्यात कमाल तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. बुधवारी नाशिकचे किमान तापमान १२ तर कमाल तापमान ३५.४ अंशापर्यंत होते. दरम्यान या चक्रीवादळाचा नाशिक जिल्ह्यावर कुठलाही परिणाम होणार नसून जिल्ह्यात पावसाचा अंदाज नाही आहे. या चक्रीवादळाचा परिणाम विदर्भातील काही ठिकाणी होऊ शकतो. मात्र अध्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत असून उष्णतेपासून बचाव करण्याचा, तसेच योग्य काळजी घेण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.
देशातील या ठिकाणी पावसाचा अंदाज?
हवामान खात्याने 23 फेब्रुवारीपर्यंत देशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर बंगालच्या उपसागरात प्रत्यवर्ती चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे गंगेच्या मैदानी भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या गंगा मैदानात 23 फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार आणि झारखंडमध्ये 20, 22 आणि 23 फेब्रुवारीला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, ओडिशामध्ये 23 फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.