नाशिक लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२५ । सध्या राज्यावर अवकाळी पावसाचे संकट आले असून हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार बुधवारी २ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या तर काही भागात विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसाने शेतपीकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाल्यामुळे नुकसान अधिक झाले आहे.
पाऊस आणि गारपीटीचा द्राक्षे आणि कांद्याला मोठा फटका बसला आहे. गारपिटीमुळे उभ्या द्राक्ष बागेतले द्राक्षमणी तडकले, तर अनेक ठिकाणी द्राक्षमणी आणि घड गळून पडले. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून यातच द्राक्ष बागांना गारपिटीचा फटका बसल्याने व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी थांबवली आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
सध्या बाजारात द्राक्षाला मिळत होता 65 ते 70 रुपये भाव मिळत आहे. मात्र अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्षाची गुणवत्ता ढासळल्याने भावावर मोठा परिणाम होणार आहे. कवडीमोल भावात द्राक्ष विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे.
दुसरीकडे पाऊस आणि गारपीटीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पाऊस आणि गारपिटीमुळे शेतात चिखल साचला असून कांद्याच्या पाती करपायला सुरुवात झाली आहे. तसेच गारपिटीमुळे कांद्याच्या मुळाशी पाणी साचल्याने कांद्याची मुळे सडण्याची भीती निर्माण झाली आहे. उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता कमी झाल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कांदा विकण्याची वेळ आली आहे.