नाशिक लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । मागच्या काही दिवसात मान्सून पावसाने राज्याला झोडपून काढले. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले. मात्र गेल्या आठवड्याभरापासून पावसाने ब्रेक घेतला. दुसरीकडे सूर्य तापू लागल्याने उकाड्यात वाढ झाली. यामुळे नागरिक हैराण झाले. दरम्यान मागच्या दोन दिवसापासून राज्यातील विविध ठिकाणी वादळी पाऊस होत आहे. आज देखील राज्यातील २३ जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. विशेष आज नाशिक जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्याच पार्श्वभूमीवर या जिल्ह्याना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान ४० ते ५० किमी/तास वेगाने सोसाट्याचे वारे, विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरीसह नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान , यंदा वेळेआधी म्हणजेच १२ ते १४ दिवस पूर्वीच मान्सून राज्यात दाखल झाला. यानंतर तीन चार दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला. मात्र यानंतर काही दिवसापासून पावसाने ब्रेक घेतला आहे. तर दुसरीकडे तापमानात काहीशी वाढ झाल्याने उकाडा वाढला. मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू शेतकरी वर्गाचे जोरदार पावसाकडे लक्ष लागले आहे. अशातच राज्यात मान्सूनचा जोर वाढणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यात १२ ते १३ जून दरम्यान मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.यावर्षी सरासरी १०६ टक्के पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्रातही यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.