नाशिक लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२५ । गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील बाजारात लाल आणि उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने भावात घसरण होत असल्याचं दिसत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. मनमाड येथील बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात सोमवारपासून सातत्याने घसरण होत आहे.
वाढती मजुरी, रासायनिक खतांचे वाढलेले भाव व इतर सर्व बाबींचा विचार केल्यास एकरी किमान ५० हजार रुपये खर्च येत आहे. मात्र आजच्या घडीला बाजारभाव सरासरी १२०० ते १५०० रुपये मिळत आहे. या भावात उत्पादन खर्च सुद्धा निघणे कठीण होत आहे.
शासनाने याबाबत तात्काळ दखल घेऊन बाजार भाव वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. बुधवारी बाजार समितीमध्ये लाल कांद्यामध्ये सुपर कांद्याला १४०० ते १७२१ तर सर्वसाधारण कांद्याला ११००ते १४०० रुपये क्विंटल असा भाव होता.