नाशिक लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२५ । एकीकडे १ एप्रिलपासून कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य केल्यानंतर कांदा दरात वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र कांदा दरात घसरगुंडी सुरूच असून यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ‘डोळ्यात पाणी’ आलं आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने निर्यात शुल्क शून्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयानंतर कांद्याचे भाव सुधारतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, निर्यात शुल्क शून्य करण्याबाबतचा निर्णय सुरू होऊन १५ दिवसांचा अवधी उलटला आहे. प्रत्यक्षात कांदा दरात मात्र कोणतीच वाढ दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्याच्या पहिल्या दिवशीदेखील कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे दिसून आले. बाजार समितीत प्रथम दर्जाच्या उन्हाळ कांद्याला ११०० ते ११४१ रुपये प्रति क्विंटल भाव आणि त्याखालच्या कांद्याला ९०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. लाल कांद्याला मंगळवारी ५३३ ते ८३० रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी ६८० रुपये प्रति क्विंटल असे भाव दिसून आले.
अन्य शेतीमालाची आवक अन् भाव असे…
मक्याची ४० ट्रॅक्टर्स इतकी आवक होऊन २०२१ ते २१९५, तर सरासरी २१७७ रुपये क्विंटल असा भाव होता. धान्य आणि कडधान्य आवारात तेजी दिसून आली. प्रामुख्याने चिंचेची आवक घटल्याने भाव वधारले आहेत. मंगळवारी बाजार समितीत चिंचेची चार गोण्या इतकी आवक झाली. २०११ ते २७९९ आणि सरासरी २४०० रुपये गोणी असे चिंचेचे भाव होते. गहू सरासरी २४३१ रुपये गोणी, तूर ६०७१ रुपये, सोयाबीन सरासरी ४१०० रुपये क्विंटल असे भाव होते.