नाशिक लाईव्ह न्यूज । ९ मे २०२५ । जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेल्या दरांनी सामान्य माणसाचे कंबरडे मोडलेले आहे. यातच महावितरणच्या नवीन स्मार्ट मीटरने ६०० ते ७०० रुपये येणारे वीजबिल आता १३५० ते १५०० रुपये वाढले आहे. यामुळे ग्राहकांना बिलाचा शॉक बसला आहे. मागील १५ दिवसांत स्मार्ट मीटरमार्फत आलेल्या वीज बिलासंदर्भात दीड हजार ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत.
ग्राहकांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्हाला नाशिकमध्ये ३० लाख मीटर बसवायचे आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांना तुमचे मीटर बदलायचे आहे का? अशी विचारणा करीत असल्याचे ठेकेदार व कर्मचाऱ्यांनी सांगितले.
या स्मार्ट मीटरबाबत मुख्यमंत्र्यांनीही ग्राहकांच्या परवानगीशिवाय वीज मीटर बदलू नका, असे सूतोवाच केले असल्याचे खुद्द वीज वितरण कंपनी अधिकारी सांगत असले तरी मग स्मार्ट मीटर लावण्याचा अट्टाहास का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. अनेक ग्राहकांच्या वीजबिलामध्ये त्रुटी असून त्यांना दुप्पट वीजबिल देण्यात आल्याचे समोर आले.
मीटरचा फोटो घेऊन रीडिंग अपडेट करणे, त्यानंतर बिल प्रिंट करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचविणे यासाठी महावितरणने खासगी एजन्सी नियुक्त केल्या आहेत; मात्र कित्येक ग्राहकांना अंदाजे रीडिंग घेऊनच बिले दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही बिलांमध्ये मागील युनिटचा समावेश करून बिल पाठवले जात आहे आणि ते भरण्यास विलंब झाल्यास वीज खंडित करण्यात येते. काही बिलांवर तर रीडिंग वेगळे, फोटो दुसरा तर बिल तिसऱ्याचेच पाठवले जात आहे. ग्राहकांनी याबाबत विचारणा केली असता, आधी संपूर्ण वीजबिल भरा, त्यानंतर पुढे पाहू, किंवा थेट वीज मीटर बदलून घ्या असे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.