नाशिक लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२५ । नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) कळवण (Kalvan) तालुक्यातील गोळाखालमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ज्यात जमीन वाटपाच्या वादातून झालेल्या भांडणात पुतण्याने सख्ख्या काकूला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारले. जिजाबाई देवीदास पवार (४८) असं मयत महिलेचं नाव असून याप्रकरणी अभोणा पोलिस ठाण्यात पुतण्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत असे की, गोळाखाल (ता.कळवण) येथे विभक्त राहत असलेल्या चार भाऊ व पाच बहिणींच्या परिवारातील सुरेश विठ्ठल पवार यांच्याकडे गत १० वर्षांपासून त्यांची विधवा बहीण सुक्रीबाई पवार या रहात होत्या. त्यामुळे त्यांच्या वाटणीची दोन एकर जमीन सुरेश कसत होता. परंतु एक वर्षापूर्वी सुक्रीबाईचे निधन झाल्याने तिच्या वाटणीची जमीन चार भावांमध्ये समसमान वाटप व्हावी यासाठी वाद सुरू होते. प्रजासत्ताकदिनी सकाळी अकरा वाजता गोळाखाल शिवारातील गट नं. २१७ मधील घरासमोर फिर्यादी देवीदास विठ्ठल पवार यांच्यासह आरोपी व नातेवाइकांनी एकत्र येत जमीन वाटपाची चर्चा सुरू केली होती. तेव्हा बहिणीचा सांभाळ केल्याने तिच्या वाटणीची दोन एकर जमीन कुणालाही देणार नाही, असे सांगून सुरेश पवार याने बाहेरच्या लोकांना जमवून मोठा वाद घातला.
त्यातच ट्रॅक्टर आणून अंगावर घालण्याचे फर्मान सोडल्याने त्याचा मुलगा हेमंत सुरेश पवार याने जिजाबाई देवीदास पवार (४८) या सख्ख्या काकूला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केले. जमलेल्या साक्षीदार, फिर्यादीस लाथा-बुक्क्यांनी व दगडगोट्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. काही जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत महिलेचे अभोणा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
कळवणचे पोलिस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. अभोणा पोलिस ठाण्यात सुरेश विठ्ठल पवार, हेमंत सुरेश पवार, नंदू सुरेश पवार, विठाबाई सुरेश पवार, सोनाली हेमंत पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक यशवंत शिंदे तपास करत आहेत.