नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक शहरातील विस्कळीत, अनियमित आणि दूषित पाणीपुरवठ्यावरून महापालिकेच्या पायऱ्यांवर महिलांनी हंडे बडवत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. ‘सांगा पाणी देणार की नाही… महापालिका मुर्दाबाद… मुर्दाबाद मुर्दाबाद…’ अशी घोषणाबाजी करत महिलांना पालिकेच्या प्रवेशद्वारीच अडविण्यात आल्याने पाण्यावरून चांगलाच राडा झाला. यावेळी महिलांनी पालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यावर संताप व्यक्त करत जाब विचारला. अखेरीस खत्री यांनी अधिकाऱ्यांसह उद्याच पाहणी करतो असे आश्वासन देत शुक्रवारचा दिवस निकाली काढला.
स्काडा वॉटर मीटर प्रणाली अंतर्गत फ्लो मीटर लावण्याच्या नावाखाली शनिवार (दि. २२) पासून शहरात विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना भोगाव्या लागत असलेल्या यातनांकडे लक्ष वेधत शिवसेना ठाकरे गटाने महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना जनआंदोलनाचा इशारा दिला. तांत्रिक कामे युद्धपातळीवर पूर्ण करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा. गोदावरीत मिसळणारे सांडपाणी बंद करून साधू- महंतांना गोदास्नासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, औद्योगिक वसाहतीत सांडपाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी, औद्योगिक वसाहतीतील पथदीप सुरळीत करावे, घरपट्टी दरवाढ मागे घ्यावी. गोदा किनारी भाविकांसाठी निवाराशेड उभारावे, रिक्त पदे तातडीने भरावी, महापालिकेच्या आरक्षित जागेवर भाजी मार्केट करावे आदी मागण्या ठाकरे गटाने आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. यावेळी शिवसेना उपनेते सुनील बागूल, सुधाकर बडगुजर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आ. वसंत गिते, विनायक पांडे, सचिन मराठे, प्रशांत दिवे आदी उपस्थित होते.
मनसेचा साखळी उपोषणाचा इशारा
मनसेने शहरातील अनियमित तसेच दूषित दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. अनियमित, कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. दूषित, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे गृहिणींमधून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लहान- मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे शहरातील पाणीप्रश्न दोन दिवसांत सोडवावा तसेच शहरातील रस्ते आठ दिवसांत बुजवावेत अन्यथा मनसेतर्फे महापालिका मुख्यालसमोर जनआंदोलन, साखळी उपोषण केले जाईल, असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला. यावेळी मनसे सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार ईचम, सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे आदी उपस्थित होते.
भाजपतर्फे हंडा मोर्चा
पंचवटीतील प्रभाग क्र. ३ मधील अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात भाजपच्या माजी नगरसेविका प्रियंका माने यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसमोर हंडा मोर्चा काढण्यात आला. आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले. या प्रभागातील सरस्वतीनगर, बळीरामनगर, बळीराजनगर, आशापुरा सोसायटी, झोपे गार्डन, हरी ओम कपालेश कॉलनी, ओंकारेश्वर कॉलनी, मानेनगर, गजानन कॉलनी, दत्तात्रय चौक, चक्रधरनगर, वृंदावन कॉलनी, लक्ष्मीनगर, औदुंबरनगर, गोपाळनगर आदी भागांत मागील दोन महिन्यांपासून अनियमित, कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. प्रभागात खासगी टॅन्करने पाणीपुरवठा करावा लागत आहे, असा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी आंदोलक महिलांनी प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. मुख्यालयात प्रवेश न दिल्यामुळे सुरक्षारक्षक व आंदोलकांमध्ये झटापटही झाली.
गोविंदनगरला अपुरा पुरवठा
नाशिक पश्चिम मतदारसंघातील भाजप आमदार सीमा हिरे यांनी गोविंदनगर भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली. अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्याचे नमूद करत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच अंबड औद्योगिक वसाहतीतील शेडसंदर्भातील प्रश्न सोडविण्याची मागणीही हिरे यांनी केली.