नाशिक लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसांपासून राज्यासह नाशिकमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात बदल होत असून कधी थंडी पडत आहे तर कधी उष्णता जाणवत आहे. नाशिक जिल्ह्यात सकाळी आणि रात्री गारठा जाणवत आहे. तर दिवसा प्रचंड उकाडा जानवत आहे. गुरुवारी नाशिकमध्ये कमाल तापमान ३१ अंशापर्यंत तर किमान तापमान १५ अंशाखाली होते.
दरम्यान हवामान खात्याने राज्याच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. उन्हाचा कडाका वाढणार असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात येत्या दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता आहे. पूर्वेकडून मुंबईकडे वाहणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे शुक्रवार ते रविवार दरम्यान मुंबईचे तापमान ३५ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मुंबईत सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील बांधकामे आणि काँक्रिटीकरणामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये तापमान वाढीचा इशारा दिला आहे. थंडी कमी होऊन तापमान ३७ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढू शकतात. दुपारच्या वेळेस वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शक्यतो या वेळेत बाहेर जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
वाढत्या तापमानामुळे उष्णतेची तीव्रता जाणवेल, विशेषतः मैदानी भागात काम करणाऱ्यांसाठी काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजना कराव्यात, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.