नाशिक लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२५ । फेब्रुवारीच्या पंधरवाड्यापासूनच राज्यात थंडी गायब होऊन तापमानाचा पारा वाढला असून यामुळे उन्हाचा चटका जाणवत आहे. नाशिकमध्येही किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाड्याने नाशिककर हैराण झाला आहे. नाशिकचे कमाल तापमान ३५ अंशावर गेले आहे.
राज्यात सध्या आकाश कोरडे आणि निरभ्र असल्याने उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग कमी झाल्यामुळे दुपारचे तापमान आणि उकाड्यात वाढ झाली आहे. सोमवारी ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३८ अंश सेल्सियसची नोंद झाली. तर नाशिकला कमाल तापमान ३५.२ तर छत्रपती संभाजीनगरला ३६.२ अंश सेल्सियसची नोंद झाली.
राज्यात आगामी ४ ते ५ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवस किमान आणि कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सियसने वाढ होणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सियसने जास्त राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या हवामान वेधशाळेने व्यक्त केला आहे.
नाशिककरांना संमिश्र हवामानाचा अनुभव
नाशिक शहर व परिसरातील वातावरणात कमालीचा बदल झालेला जाणवत आहे. मागील काही दिवसांपासून नाशिककरांना पहाटे व रात्री थंडीचा कडाका तर दिवसा उन्हाचा तडाखा असे संमिश्र हवामान अनुभवयास येत आहे. नाशिककरांना थंडीसोबत ऊनदेखील अनुभवयास येत आहे. दिवसभर वातावरणात उष्मा जाणवत आहे. येत्या १८ तारखेपर्यत नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत माफक स्वरूपात थंडीची तीव्रता पहाटे व रात्री नाशिककरांना जाणवणार आहे, असे हवामान विभागाने म्हटले असले तरी कमाल तापमानात मोठी वाढ होत असल्याने नाशिककर उभ्याने हैराण झाले आहेत.