जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२५ । राज्यात उन्हाचा तडाखा वाढला वाढला आहे. नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून पुन्हा उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिकांना चटका सहन करावा लागत आहे. बुधवारी नाशिकचे कमाल तापमान ३९.४ तर किमान तापमान २०.८ अंश इतके होते. दरम्यान उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असून, गुरुवार (ता. १७) आणि शुक्रवार (ता. १८) असे दोन दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या दोन दिवसांत उष्ण व दमट वातावरण राहणार असल्याने उकाड्यात आणखी भर पडेल.
यंदाच्या उन्हाळी हंगामात सूर्याच्या तीक्ष्ण किरणांनी नागरिक बेजार झाले आहेत. कमाल तापमान सातत्याने ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास राहत असून, यामुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. दिवसाच्या वेळी कडक ऊन असताना रात्रीदेखील कमालीचा उकाडा जाणवत आहे. त्यामुळे बचावासाठी नागरिकांना एसी, कूलरचा आधार घ्यावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे पारा काही प्रमाणात खालावला असताना आता पुन्हा पाऱ्यात वाढ झालेली आहे.
सोमवारी (ता. १४) नाशिकचे किमान तापमान २०.३, तर कमाल तापमान ३८.१ अंश सेल्सिअस नोंदविले होते. यामध्ये वाढ होऊन मंगळवारी (ता. १५) नाशिकचे किमान तापमान २२.८ अंश, तर कमाल तापमान ३९.१ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. तर काल बुधवारी नाशिकचे कमाल तापमान ३९.४ तर किमान तापमान २०.८ अंश इतके होते.
दरम्यान उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये आज गुरुवार (ता. १७) आणि शुक्रवार (ता. १८) असे दोन दिवस येलो अलर्ट दिला असून, या दिवशी उष्ण व दमट वातावरण राहणार आहे. यामुळे पारा पुन्हा ४० अंश सेल्सिअसची पातळी ओलांडण्याची दाट शक्यता आहे. उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले जाते आहे.