नाशिक लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२५ । गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे नाशिकचे तापमान चाळीशीच्या खाली होते. यामुळे काहीसा थंडा थंडा कूल कूल जाणवत होते. मात्र आता ढगाळ वातावरण निवल्यामुळे नाशिकचा तापमानाचा पारा चाळिशीपार गेला. यामुळे नाशिकमध्ये एप्रिल महिन्यातच ‘मे हीट’चा कडाका वाढला आहे.
रविवारी ४०.२ अंश तापमानाची नोंद झाली.नाशिक शहरात गेल्या दहा वर्षांत प्रथमच एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पारा चाळिशी पार गेला आहे. रविवारी नाशिकमध्ये सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढली असल्याने उन्हाचा चटका सहन करावा लागत होता. दुपारनंतर सूर्य आग ओकत असून उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. रात्रीचाही पारा २० अंशावर गेल्याने उकाडा जाणवत आहे.
दरम्यान, राज्यात वातावरण उष्ण व दमट रहाणार असल्याने आगामी दोन दिवस किमान आणि कमाल तापमानात वाढ होणार आहे. ते सरासरी तापमानापेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने अधिक रहाण्याची शक्यता आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये अचानक तापमान वाढू शकते. तर काही शहरांमध्ये मध्यम ते तीव्र उष्णतेची लाट देखील जाणवण्याची शक्यता मुंबई हवामान वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ यांनी वर्तविला आहे.
भाज्यांचे दर आवाक्यात
नाशिकचा पारा चाळीशीवर गेला असला तरी भाज्यांचे दर मात्र आवाक्यात असल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे. अगदीच मार्च महिना सुरू होताच भाज्यांचे दर कडाडतात असा अनुभव आहे. यंदा मात्र तसे झाले नाही. भाज्यांची आवक जास्त असल्याने एप्रिल उजाडला तरी भाव मात्र सामान्यांना परवडणारे आहेत. एक-दोन नाशिक जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पादन वाढले असून मुंबईच्या बाजारातही नाशिकच्या भाज्यांनी आपले बस्तान बसविल्याने भाजीपाला उत्पादक समृद्ध होत आहेत.