नाशिक लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२५ । लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून एकच दिवसात राज्यात चार ठिकाणी लाचखोरीच्या घटना समोर आले आहे. ज्यात महाराष्ट्र व गुजरातला जोडणाऱ्या पेठ येथील चेकपोस्टवर खासगी बसचालकाकडून शुल्काच्या (कम्पाउंड फी) नावाखाली ५०० रुपयांची लाच घेताना नाशिकचा आरटीओ अधिकारी नितीन अहिरे, एजंट विनोद साळवे व मनोहर निकम यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईने खळबळ उडाली आहे. अहिरेला १ लाख १० हजार रुपये पगार असून त्याने लाच घेतली आहे.
नेमकी कशी केली कारवाई?
तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते असून ते नियमितपणे नाशिकहून गुजरातमध्ये सहलीचे आयोजन करतात. दरवेळी पेठ चेकपोस्टवर परराज्यात प्रवेशासाठी कम्पाउंड फीच्या नावाखाली चार ते पाच हजारांच्या दंडात्मक कारवाईची पावती त्यांच्याकडून फाडली जायची. तक्रारदाराने संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर सापळा रचण्यात आला.
उपअधीक्षक दिलीप साबळे, निरीक्षक वाल्मीक कोरे ट्रॅव्हल्स बसमध्ये चालकाच्या शेजारी बसले होते. चेकपोस्टवर आल्यावर एजंट विनोद साळवे व निकम यांनी ४ हजार रुपये प्रवेश शुल्काची मागणी केली. तडजोडीनंतर २ हजार रुपये देण्याचे ठरले. कॅबिनमध्ये बसलेले मोटार वाहन निरीक्षक नितीन अहिरे यांनीही इ-चलन फाडावेच लागेल, असे म्हणत आता ५०० रुपये द्या आणि परतीच्या वेळी उर्वरित दीड हजार देऊन टाका असे बसचालकाला सांगितले. त्याचवेळी ५०० रुपये देताना एजंट साळवेसह अधिकारी अहिरे व निकम या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
यावेळी अहिरेकडून दीड लाखांचा मोबाइल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, गेल्या वर्ष-दीड वर्षापासून या विभागात सापळा होत नसल्याने ही कारवाई चर्चेत आली आहे. पेठ चेकपोस्टवर नियुक्तीसाठी लाखोंची बोली लागली जात असल्याच्या चर्चेला या कारवाईमुळे दुजोरा मिळाला आहे.