नाशिक लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२५ । मार्च महिन्यात राज्यातील वातावरणात अनेक बदल घडून येत आहेत. सध्या राज्यावर अवकाळीचे ढग असल्याने अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. नाशिकच्या मालेगावात चालू हंगामातील सर्वाधिक ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर या आठवड्याभरापासून तापमानात सौम्य गतीने घट होत तब्बल ४ अंश सेल्सिअस इतके घसरले आहे.
काल शुक्रवारी (दि. २९) मालेगावचे कमाल ३६ अंश सेल्सिअस व किमान १९.४ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. दरवर्षी मालेगावचे तापमान राज्यातील सर्वाधिक उष्ण प्रमुख पाच शहरांच्या यादी नोंदविले जाते. यावर्षी वाढलेल्या तापमानात मालेगावात कमाल ४०.२ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली होती. तब्बल आठवडाभर उष्णतेचा तडाखा टिकून होता.
मात्र १५ मार्चनंतर तापमानात सौम्य गतीने तापमानात घसरण सुरू झाली. दररोज किमान एक ते दोन अंश एवढे कमाल तापमान घसरले. परिणामी उन्हाची काहिली कमी झालेली असली तरी दुपारचा चटका टिकून आहे. पहाटे चार वाजेनंतर मात्र परिसरात गारवा पसरतो. हा गारवा सकाळी साडेसात वाजेपर्यंत टिकून असतो. यानंतर सौम्य गतीने तापमानात वाढ होते. दुपारी पाचनंतर उष्णता कमी झाल्याचे जाणवते. रात्री घरातील उकाडा मात्र कायम आहे, यामुळे घराघरात पंखे सुरू झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यात सध्या अवकाळीचा परिणाम नसला तरी रविवार (दि. २३) ते मंगळवार (दि. २५) दरम्यानच्या तीन दिवस ढगाळ वातावरणच राहील. अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. दुपारच्या कमाल तापमानात काहीशी घट होईल. महाराष्ट्रात कोठेही सध्या उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचं हवामान खात्याचे हवामानतज्ज माणिकराव खुळे यांनी म्हटलं.