नाशिक लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२५ । आल्हाददायक वातावरणाचे शहर, अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये आता सूर्य आग ओकू लागला असून रविवारपाठोपाठ सोमवारीही (दि. ८) दिवसभर उन्हाच्या झळा अधिकाधिक तापल्याने नागरिक हैराण झाले होते. सोमवारी नाशिकचे किमान तापमान 19.8 अंश तर कमाल तापमान 40.3 अंश नोंदविले गेले. दरम्यान नाशिकला आगामी दोन दिवस उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
एप्रिल उजाडताच तापमानाचा पारा चाळीशीच्या पार गेल्याने शहरातील बाजारपेठा रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. नागरिकांनी वाढत्या उष्णतेपासून सावध राहण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. सुमारे तेरा वर्षांनंतर पहिल्यांदाच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाने चाळिशी ओलांडली आहे.
रविवारी पाठोपाठ सोमवारीही कमाल तापमानाचा पारा चाळीशीवर स्थिरावला. किमान तापमानातसुद्धा वाढ होऊ लागली असून यामुळे रात्रीही नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी रात्रीदेखील वातानुकूलित यंत्रणा, पंखे, कूलरचा अधिकाधिक वापर करीत आहेत.पुढील दोन दिवस उष्णतेच्या लहरी अधिक वेगवान होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज मंगळवार व उद्या बुधवारी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ दर्शविण्यात आला आहे.
उष्णतेपासून असा करा बचाव
विशेषत : सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान पारा चाळीशी ओलांडत आहे. वाढत्या उष्णतेममुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊन डिहायड्रेशन, उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडू नये, शीतपेयांचा वापर करावा, विशेषत: लिंबू पाणी घ्यावे, बर्फाचे पदार्थ घेणे टाळावे, ताक, लस्सी यांचे सेवन करावे आदी सूचना महापलिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.