नाशिक लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२५ । नाशिक- दिल्ली इंडिगोची रोजची उड्डाणे १५ एप्रिलपासून दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल १ वरून होतील. टर्मिनल १ हे देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी प्राथमिक टर्मिनल आहे आणि अधिक उड्डाणे सामावून घेण्यासाठी त्याचा विस्तार करण्यात आला आहे.
यापुढे इंडिगोची सर्वच देशांतर्गत विमानसेवांची उड्डाणे ही टर्मिनल १ वरूनच होतील. कालपर्यंत ही सेवा टर्मिनल २ वरून देण्यात येत होती. हे टर्मिनल आता गरजेनुसार आंतरराष्ट्रीय उड्डाणांकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बदलाबाबत इंडिगोने ग्राहकांना संदेश पाठवून सूचित केले आहे.
त्या १५ एप्रिलपासून इंडिगोची सर्व उड्डाणे टर्मिनल-२ वरून टर्मिनल-१ वर हलविण्यात येणार असल्याचे निवेदन जारी करण्यात आले आहे.
दिल्ली विमानतळ प्रशासनाने यासंदर्भात स्पष्ट केले आहे की, टर्मिनल-२ वर देखभाल आणि सुधारणा कामे सुरू होणार असल्याने हा बदल आवश्यक आहे. त्यामुळे टर्मिनल-२ येत्या दोन आठवड्यांसाठी बंद राहणार आहे. नाशिकहून दिल्लीसाठी दररोज सकाळी नऊ वाजता इंडिगोची थेट विमानसेवा उपलब्ध आहे. नाशिकहून दिल्लीला प्रवास करणार्या प्रवाशांनी आपली तिकिटे तपासून नवीन टर्मिनलमधून उड्डाणाची नोंद घ्यावी, असे आवाहन इंडिगो एअरलाईन्सने केले आहे.
दिल्ली-नाशिक-दिल्ली विमानसेवेचा फायदा उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना होत आहे. सुरुवातीला १८० आसनी विमानाचा वापर केला जात होता, मात्र प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता सध्या ३२० आसनी एअरबस विमान वापरले जात आहे.