नाशिक लाईव्ह न्यूज । १३ मे २०२५ । मे महिन्यात तापमानाचा पारा ४५ अशांच्या वर जात असल्यामुळे घामाच्या धारा वाहणारा उकाडा जाणवत असतो. मात्र यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाच्या सावटामुळे हवामानात मोठा बदल होऊन तापमानात घसरण झाली. यामुळे नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळतोय. राज्यात अद्यापही अवकाळी पावसाचे संकट कायम असून नाशिक जिल्ह्याला देखील अवकाळीने चांगलाच तडाखा दिला. अवकाळीचा हा कहर पुढील दोन दिवस राहणार आहे. याबाबत हवामान विभागाकडून मंगळवार आणि बुधवार ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर त्यानंतर दोन दिवस ‘ग्रीन अलर्ट’ जारी केला आहे.
गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळीमुळे कांदा पिकासह फळभागाला मोठा फटका बसला आहे. अवकाळीमुळे जिल्ह्यात 795 हेक्टरवरील कांदा तर 332 हेक्टरवरील भाजीपाला कवडीमोल झाला आहे. 695 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले असून, 524 हेक्टरवरील आंब्याच्या फळबागांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान नाशिक प्रमाणेच राज्यात काही भागांत आठ दिवसांपासून अवकाळीचे ढग आहेत. बहुतांश भागांत सोसाट्याचा वारा, गारपीट आणि मध्यम सरींच्या पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसाचा मुक्काम अद्याप दाेन दिवस वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
13 मे नाशिकसह ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
14 मे – नाशिकसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, घाट माथा अहिल्यानगर, पुणे