नाशिक लाईव्ह न्यूज । पती-पत्नीच्या वादामुळे विभक्त राहणाऱ्या वडिलांकडे सांभाळ असलेल्या दीड वर्षी मुलीचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. मात्र, पित्याने याबाबत वाच्यता न करता मखमलाबाद परिसरातील स्मशानभूमीत तिचा मृतदेह पुरून अंत्यसंस्कार केले. घटनेच्या काही दिवसांनी वडिलांनी मुलीचा घातपात करून मारल्याचा आरोप मुलीच्या आईने केला असून याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि पंचाच्या उपस्थितीत वैष्णवी वळवी या चिमुकलीचा मृतदेह पुन्हा स्मशानभूमीतून उकरून काढण्यात आला. या घटनेनं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. या चिमुरडीचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यावरच आता सत्य समोर येणार आहे.
वैष्णवीचे आई वडील शेतमजूर आहेत. या दाम्पत्यामध्ये वाद सुरू असल्याने मुलीला आणि नवऱ्याला सोडून आई माहेरी निघून गेलेली होती. मात्र पंचवटी मखलमाबाद शिवारात असलेल्या शेतात खेळताना पाय घसरून विहिरीत पडली. वडील विकास वळवी यांनी शोध घेतला असता दीड तासानंतर विहिरीत मृतदेह तरंगताना दिसून आला. शेतमजुरांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून खासगी रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. यानंतर विकास यांनी वाच्यता न करता मखमलाबाद परिसरातील स्मशानभूमीत तिचा मृतदेह पुरून अंत्यसंस्कार केले.
पतीने मुलगी विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची खबर दिल्यानंतर आईने मखमलाबाद येथे दुसऱ्या दिवशी सकाळी धाव घेत मंगळवारी ११२ क्रमांक फिरवून पतीने मुलीचा खून करून विहिरीत फेकून दिल्याची माहिती दिली. पती विकास वळवी यांचं कृत्य संशयास्पद असून मुलगी झाल्यापासून ते वाद घालत होते, असा आरोप पत्नीने केला आहे.
दरम्यान, वैष्णवीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मृतदेह पुन्हा जमिनीतून बाहेर काढण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला. या अर्जाबाबत कोर्टाने सरकारी पक्षाचं म्हणणं ऐकून घेत तहसीलदारांना आदेश दिले. २ दिवसांपूर्वीच बालिकेचा मृत्यू झाला असून तिला जमिनीत पुरून अंत्यविधी करण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेह पुन्हा बाहेर काढत जिल्हा रूग्णालयात पोस्टमोर्टमला पाठवला. या चिमुरडीचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यावरच आता सत्य समोर येणार आहे.