नाशिक लाईव्ह न्यूज । १२ मे २०२५ । यंदाचा मार्च एप्रिल महिन्यात सूर्यनारायण चांगलाच तापला. एप्रिलमध्ये तापमान ४२ ते ४४ अंशापर्यंत गेल्याने मे हिटचा तडाखा जाणवला. यानंतर उष्णतेने होरपळून निघणाऱ्या नागरिकांना मे महिन्याची चिंता लागून राहिली. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीलाच वातावरणात बदल होऊन अवकाळीने हजेरी लावल्याने तापमानात घसरण होऊन उकाड्यातून दिलासा मिळाला. आता यानंतर मान्सूनची वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
भारतीय हवामान विभागाने यंदा चार दिवस आधीच मान्सून केरळमध्ये येणार असल्याचे म्हटले आहे. सध्या नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागांत पोहोचला असून तो 13 मे पर्यंत निकोबार बेटांवरही पोहोचेल, असा अंदाज आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार, पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रात प्रगती करेल. त्यामुळे यंदा मान्सून नियोजित वेळेच्या चार दिवस आधी केरळमध्ये दाखल होणार आहे. ही स्थिती 2008 नंतर प्रथमच घडतेय.
सामान्यतः केरळमध्ये मान्सून 31 मे रोजी पोहोचतो. मात्र यंदा 27 मे रोजीच तो दाखल होणार आहे.
यानंतर गोव्यामध्ये पाच जून तर महाराष्ट्रातील किनारपट्टी भागांत 6 जूनपर्यंत मान्सून येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पावसासंदर्भात भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज 2015 वगळता गेल्या 20 वर्षांत बरोबर ठरला. यंदा अल निनो किंवा ला निना याबाबत कोणतीही परिस्थिती उद्भवणार नसल्याचे म्हटले आहे.
मान्सून कधी कुठे पोहचणार?
5 जून : गोवा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, पश्चिम बंगाल.
6 जून : महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचे किनारपट्टी व्यतिरिक्त जिल्हे.
10 जून : मध्य महाराष्ट्र, मुंबई, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, बिहार.
15 जून : गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश.
20 जून : गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली.
25 जून : राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश.
30 जून : राजस्थान, नवी दिल्ली.