नाशिक लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२५ । मनमाडकरांना एक दिलासा देणारी बातमी आहे . मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सध्याच्या व्यवस्थेतील नव्या करंजवण योजनेतून जुन्य ९ व नवीन ३ टाक्या जोडण्याचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे अंतर्गत पाइपलाइन जोडणी पूर्ण होताच करंजवण योजनेतून मनमाडकरांना पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मनमाडकरांना ४ ते ५ दिवसाआड पाणी मिळू शकते.
मार्चअखेरपर्यंत पाणीपट्टी पूर्ण भरणाऱ्यांनाच करंजवन योजनेचे नळ कनेक्शन जोडून देण्याची अट पालिकेने टाकली आहे. पालखेडमधून सिंचनासाठीचे रोटेशन सोडले असून ते पाणी येवल्यापर्यंत आले आहे. मनमाडसाठी पुढील आठवड्यात पाटोदा येथील तलाव भरला जाणार आहे. त्यासाठी २८० अश्वशक्तीचे चार वीज पंप कार्यान्वित ठेवले आहे. यावर्षी वाघदर्डीत दोन महिने म्हणजे मे महिन्यांपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे.
पालखेडच्या रोटेशनमुळे त्यात दीड महिन्याची भर पडेल. सध्या शहराला १४ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. करंजवन ते भारतनगर फिल्टर प्लांटपर्यंत पाइपलाइनमधून पाणी घेण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.