नाशिक लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२५ । राज्यभरात होळीपूर्वी उन्हाचा तडाखा पाहायला मिळतोय. अनेक शहरातील तापमानाने चाळीशी गाठल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहे. यातच दरवर्षी उष्णतेचे हॉटस्पॉट ठरणाऱ्या मालेगाव शहरात बुधवारी यंदाचे सर्वाधिक ४० अंश कमाल तापमान नोंदविले गेले.
राज्यात दरवर्षी मालेगाव शहर उष्णतेचे हॉटस्पॉट ठरत असते. साधारण एप्रिल महिन्यात चाळिशी गाठणाऱ्या तापमानाने यंदा मार्च महिन्यातच ४० अंशांचा टप्पा गाठला आहे. गेल्या शनिवारी तापमान ३५.८ अंश होते. यात वाढ होऊन रविवारीचा पारा ३५. ९ अंशांवर पोहोचला होता. सोमवारीही पारा ३७.२ अंशांवर राहिल्याने उच्चांकी तापमान कायम होते. मंगळवारी पारा ३८.४ अंश होता. यात दोन अंश वाढ झाल्याने बुधवारचा पारा ४० अंशांवर पोहोचला आहे.
दिवसेंदिवस उकाड्यात वाढ होत आहे. सकाळी आठ वाजताच सुर्य नुसती आग ओकण्यास सुरवात करीत आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाचा चटका जाणवत आहे. उन्हाचा चांगलाच तडाखा बसू लागल्याने नागरिक बेजार झाले आहेत. भर दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. मार्च महिन्यातच सूर्य आग ओकू लागल्याने एप्रिल व मे महिन्यातील उन्हाच्या भीतीने नागरिक धास्तावले आहे.
दरम्यान नाशिकमध्ये उन्हाची रखरख आणि अंगाची लाही लाही करणारा उकाडा वाढला आहे. पुढील काही दिवस सूर्य आग ओखणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.