नाशिक लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२५ । राज्यातील तापमानात अचानक बदल झाला असून गेल्या काही दिवसांपासून पहाटे हलका गारवा आणि दुपारी प्रचंड उन्हाच्या झळा जाणवत आहेत. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३८ अंशापर्यंत पोहोचले आहे. येत्या 3-4 दिवसांत तापमान चढेच राहणार असून उष्णतेचा चटका अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे . सध्या उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वाधिक तापमानाच्या नोंदी होत आहेत.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. नाशिकमध्ये देखील तापमान ३५ अंशावर गेलं असून यामुळे उन्हाचा कडक चटका बसत आहे. दरम्यान, अजून दोन दिवस उन्हाचा तडाखा राज्यात राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारणपणे एक ते दोन सेल्सियसने कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.
दिवसा कडक ऊन, रात्री थंड
राज्यात सध्या दिवसा कडक ऊन जाणवत आहे. तसेच रात्रीच्या वेळी थंडी वाढत आहे. त्यामुळे विचित्र वातावरणाचा सामाना नागरिकांना करावा लागत आहे. साधारणपणे मार्च महिन्यात होळीनंतर तापमान वाढ होत असते. परंतु यंदा फेब्रुवारीच्या मध्यामध्ये वाढलेले तापमान हे उत्तर भारतातील झालेल्या हवामान बदलामुळे आहे. हे वाढलेले तापमान साधारण दोन-तीन दिवस असणारा आहे.
18 फेब्रुवारीला अकोल्यात सर्वाधिक म्हणजेच 37.8 अंश सेल्सियसची नोंद झाली. ब्रम्हपुरीतही साधारण असेच तापमान होते. अमरावतीत 36.4 अंश सेल्सियस तापमान होते. वाशिम जिल्ह्याचा पारा 37 अंशांवर गेला होता. तर चंद्रपूर,भंडारा,गोंदिया, गडचिरोली, वर्धा,यवतमाळ या जिल्ह्यांचा पारा 35 – 37 अंशांपर्यंत गेला होता. नाशिकचे तापमान 35.7 अंश होते.