नाशिक लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन बारावीच्या निकालाची अधिकृत घोषणा केली. ज्यात त्यांनी राज्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९१.८८ टक्के निकाल लागल्याची माहिती दिली.
या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली असून, मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८% इतकी नोंदवली गेली आहे. तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१% इतकी आहे. याचा अर्थ, मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा ५.०७% ने अधिक आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ११ फेब्रुवारी ते मंगळवार, १८ मार्च २०२५ या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली, तर, ३७ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल आज १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना हा रिझल्ट अधिकृत संकेत स्थाळावर पाहता येणार आहे.