नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक जिल्ह्यात तणनाशक फवारल्याने १२८ शेतकऱ्यांचे २०५ एकरचे नुकसान झाले. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने यात, जिल्ह्यातील नऊ कृषी सेवा केंद्रांचा परवाने रद्द केले आहेत.
यात देवळ्यातील दोन, सटाणा तीन, कळवण तीन व नाशिक तालुक्यांतील एका सेवा केंद्राचा समावेश आहे. तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून संबंधित कंपन्यांकडे प्रस्तावही दाखल केला आहे.
कांदा पिकातील तण मारण्यासाठी शेतकरी रासायनिक औषधांची फवारणी करतात. त्यासाठी आयपीएल व अनु प्रोडक्ट्स या औषधांची फवारणी करण्यात आली होती. त्यामुळे कांद्याचे पीक जळून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात कळवणमध्ये १८ शेतकऱ्यांचे २७.४२ एकरांचे नुकसान झाले. देवळ्यात ५५ शेतकऱ्यांचे ९८.१५ एकरांचे नुकसान झाले. बागलाणमध्येही दहा शेतकऱ्यांचे १८.३० एकरांचे नुकसान झाले. आयपीएलमुळे जिल्ह्यात ८३ शेतकऱ्यांचे १४३.८७ एकरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
तर या तणनाशकामुळे ४५ शेतकऱ्यांचे ६१.०५ हेक्टरचे नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रचालकांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. १२) कृषी सेवा केंद्रांची सुनावणी झाली. तसेच ज्या कृषी सेवा केंद्रचालकांना समाधानकारक उत्तर देता आले नाही, त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई कृषी उपसंचालकांनी केली आहे. यावेळी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी व कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.