नाशिक लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२५ । मार्चअखेरमुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व शेतमालाचे लिलाव शुक्रवारपासून (दि. २८) ते मंगळवारपर्यंत (दि. १) या पाच दिवसांच्या कालावधीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद राहणार आहे. भाजीपाला व द्राक्षमणी या नाशवंत शेतमालाचे लिलाव नियमित सुरू राहणार आहेत.
लासलगाव असोसिएशनने लासलगाव बाजार समिती प्रशासनास दिलेल्या पत्रानुसार शुक्रवारी व्यापारी बाहेरगावी जाणार असल्याने तसेच शनिवारी अमावस्या, रविवारी साप्ताहिक सुटी, सोमवारी दिनांक रमजान ईद तसेच मंगळवारी बँक व्यवहार बंद असल्यामुळे एकूण ५ दिवस लासलगाव बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद राहतील.
दरम्यान, शेतकऱ्यांनी कांदा व भुसारमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे. २ एप्रिलपासून बाजार समितीतील कांदा व भुसार मालचे लिलाव पूर्ववत होतील. एप्रिलपासून कांदा निर्यातमूल्य शुल्क रद्द केली जाणार असल्याने कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात कांद्याचे काय भाव निघतात याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागलेली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक अडचण येणार
सध्या ठिकठिकाणी उन्हाळा कांदा काढण्याचे काम जोमात सुरू आहे. अपरिपक्व ऊन्हाळ कांदा बाजार समितीत विक्री केला जातो. चांगल्या दर्जाचा मात्र कांदा चाळीत साठवून दर वाढल्यानंतर तो विक्री करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. लासलगावसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. परंतु, आता पाच दिक्स बाजार समितीत कांद्याचे लिलाव होणार नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण होणार आहे.