नाशिक लाईव्ह न्यूज । बहुप्रतीक्षित मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी भूसंपादन अधिकाऱ्याची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर भूसंपादन कण्याच्या जमिनीचे तपशीलही जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता भूसंपादन कार्यास गती येणार आहे. मध्य रेल्वेचे भुसावळ विभागाचे उपमुख्य अभियंता (निर्माण) यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता या प्रकल्पासाठी नाशिक येथील भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणाऱ्या मनमाड – इंदूर रेल्वे मार्ग प्रकल्पाचे मध्य प्रदेशातील काम जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहे. आता महाराष्ट्रातील या प्रकल्पाच्या कामालाही वेग येणार आहे. धुळे आणि मालेगाव तालुक्यांतील भूसंपादन प्रक्रिया आता होणार आहे. आगामी काळात नांदगाव तालुक्यातील सहा आणि मालेगाव तालुक्यातील १५ गावांमध्ये अशा २१ गावांत भूसंपादन करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला मनमाड – इंदूर रेल्वे मार्ग आता खर्या अर्थाने दृष्टिपथात येत आहे. खरंतर मनमाड ते नवीन धुळे आणि नरडाणा ते डॉ. आंबेडकरनगर या दरम्यान प्रस्तावित 309.43 किमी लांबीच्या नवीन रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
या गावांमध्ये भूसंपादन?
या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड, अस्तगाव, पांझणदेव, खाटगाव, नवसारी व भाडी या सहा, तर मालेगाव तालुक्यातील चोंढी, जळगाव, काळेवाडी, घोडेगाव चौकी, वऱ्हाणे, मेहुणे, ज्वार्डी बुद्रूक, येसगाव, सवंदगाव, सायने बुद्रुक, माल्हणगाव, चिखलओहोळ व झोडगे यांसह १५ गावांमध्ये भूसंपादन होईल, त्यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी होणार आहे.