नाशिक लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । ‘समृद्धी महामार्गा’च्या शेवटच्या ७६ किमी टप्प्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केलं जाणार आहे. नाशिकच्या इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे हा महामार्गाचा शेवटचा टप्पा असून यामुळे मुंबईतून नाशिक अडीच तासांत गाठता येणार असल्याचं बोललं जात आहे.
खरंतर नागपूर आणि मुंबई अशा दोन महानगरांना जोडणारा हा समृद्धी महामार्ग प्रकल्प राज्यातील १० जिल्ह्यातून जातो. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबईचा प्रवास ८ तासांवर येऊन पोहोचला आहे. समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा आहे.
समृद्धी महामार्ग’ कोणत्या जिल्ह्यांतून जातो?
समृद्धी महामार्ग राज्यातील १० जिल्ह्यातून जातो. यात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबई अशा एकूण दहा जिल्ह्यांचा समावेश होतो. या १० जिल्ह्यातील ३९० हून अधिक गावांचा समावेश होतो. तसेच राज्यातील २० हून अधिक तालुक्यांना जोडण्याचं काम हा मार्ग करतो. या महामार्गावर ३३ मोठे पूल आहेत. तर २७४ छोटे पूल आहेत. तसेच यात ६५ उड्डाणपूल आणि ६ बोगद्याचाही समावेश होतो. त्याचबरोबर २६ पथकर नाके आहेत.
गेम चेंजर समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर आणि नाशिकच्या प्रवासाचं अंतर आणि वेळ वाचणार आहे. मुंबई ते नाशिक प्रवासाला अवघे ३ तास ४५ मिनिटे लागतात. मात्र, या महामार्गामुळे प्रवास २ तास ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. या महामार्गामुळे १ तास २० मिनिटांची बचत होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे जवळपास ४० किमी अंतर कमी झालं आहे.