नाशिक लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२५ । एकीकडे राज्यात सूर्य आग ओकत असतानाच राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झालं आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यामध्ये पावसासाठी पोषक हवामान तयार झालेय. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.शिवाय काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
पूर्व विदर्भात पुढील तीन दिवस अवकाली पावसाचा इशारा देणयात आला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे.
दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
नाशिकमधील स्थिती काय?
दरम्यान, नाशिकच्या तापमानातही वाढ झाली असूनतापमानाने चाळीशी गाठली आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत असून दुपारी ११ ते ४ वाजेपर्यंत बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येतो. गुरुवारी नाशिकचे कमाल तापमान ४१.७ तर किमान २३.३ इतके होते. दरम्यान राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी नाशिकला हवामान खात्याने कुठलाही अवकाळीचा इशारा दिला नाहीय. मात्र तापमानात तफावत दिसून येतील आणि उकाडा कायम राहील.