नाशिक लाईव्ह न्यूज । द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी लुबाडले अशा बातम्या अनेकदा वाचण्यात येतात मात्र द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथील दोघा शेतकऱ्यांच्या बागेतून अंदाजे ७० ते ८० क्विंटल द्राक्ष अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चोरीमुळे शेतकरी राहुल वामनराव भोसले आणि जितेंद्र अशोकराव भोसले यांना सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या द्राक्ष बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू असताना, अनेक ठिकाणी द्राक्ष माल घेऊन पैसे न देता पलायन करण्याच्या घटनाही समोर येत आहेत. अशा परिस्थितीत आता सरळ बागेतूनच मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची चोरी होण्याच्या प्रकारांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून, त्यांनी पोलिसांनी त्वरित तपास करून चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे प्रशासनानेही याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. द्राक्ष उद्योग हा अनेक शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या चोऱ्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.