नाशिक लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज अनेक महत्त्वाचे मुद्दे सभागृहात मांडले. यावेळी त्यांनी नाशिक व जळगाव या जिल्ह्यांना सिंचनाचा फायदा करून देणाऱ्या नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पाची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याची निविदा काढण्यात आली असल्याची माहिती विधानसभेत दिली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 7 हजार 15 कोटी 29 लाख रुपये खर्च आला आहे.
नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून 9.19 टीएमसी पाणी उचलून 14.56 किमी बोगद्याद्वारे गिरणा नदी पात्रात चणकापूर धरणाच्या बाजूस पाणी सोडण्यात येईल. यामुळे 49 हजार 761 क्षेत्र सिंचित होणार आहे. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषण ठरावावारील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच राज्यातील सिंचनाच्या कामांबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण राज्यात सिंचनाच्या क्षेत्रात मोठे काम गेल्या काही वर्षात करत आहोत. 160 प्रकल्पांना फेर प्रशासकीय मान्यता दिली आहे. सिंचनाचे प्रकल्प वेगाने सुरु आहोत. राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार-2 ही योजना आणली. नदीजोड प्रकल्पही आपण हाती घेतला आहे. मराठवाड्यात सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मराठवाड्यात सिंचन आणि पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी सुरू होणार आहे. संभाजीनगर आणि जालना हे औद्योगिक क्लस्टर होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पाण्याची गरज भासणार आहे. नदीजोड प्रकल्पामुळे त्याला फायदा होणार आहे.