नाशिक लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२५ । एकीकडे महावितरणकडून येणाऱ्या अवाच्या सव्वा वीज बिलामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून यातच महावितरण ने अचानक वीज बिलात प्रति युनिट सरासरी ६० पैसे वाढ केली. इंधन समायोजनाच्या नावाखाली ही वाढ केली असून तसेच अतिरिक्त सुरक्षा बिलाचा चटका ग्राहकांना दिला आहे. दरम्यान हे वाढीव वीजबिल कमी करावे व अतिरिक्त सुरक्षा ठेव बील रद्द करावे, अशी मागणी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतने केली आहे.
वीजबिलात १ एप्रिलपासून वाढ केली असून प्रत्येक ग्राहकाच्या बिलात २५ ते १०० रुपयांची वाढ होणार आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांपर्यंत सर्वांनाच आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. ही वाढ मार्चच्या वीज वापरावर लागू झाली असली, तरी काही महिन्यांतही त्याचा परिणाम कायम राहण्याची शक्यता आहे. वीज कनेक्शन घेताना सुरक्षा ठेव म्हणून काही रक्कम घेतली जाते.
नंतर अतिरिक्त सुरक्षा ठेव कशी काय घेतली जाते. या विषयी वीज वितरण कंपनीच्या धोरणाबद्दल ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. वीज दरवाढीसाठी इंधन समायोजन शुल्क (एफएसी) लागू केले आहे. वीज खरेदीच्या खर्चाची भरपाई करण्यासाठी आता ग्राहकांकडून ते शुल्क वसूल केले जात आहे. यासाठी ३० मार्च २०२० च्या नियामक आयोगाच्या आदेशाचा दाखला महावितरणने दिला आहे.
घरगुती ग्राहकांना प्रतियुनिट ६० पैसे, व्यावसायिक ग्राहकांना ४० ते ६० पैसे, कृषी क्षेत्राला १५ ते ३० पैसे, पथदिवे वीज योजनांना ३० ते ३५ पैसे, पाणीपुरवठा योजनांना ३० ते ३५ पैसे, ईव्ही चार्जिंग स्टेशनांना ४० पैसे आणि औद्योगिक ग्राहकांना ३५ ते ४० पैसे अतिरिक्त शुल्क आकारले आहे.प्रत्येक ग्राहकांना वेगवेगळ्या रकमेची अतिरिक्त सुरक्षा बिले देण्यात आली आहेत.