नाशिक लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२५ । महागड्या स्वयंपाकाच्या खाद्यतेलाने होरपळून निघणाऱ्या सर्वसामान्यांना आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच केंद्र सरकारने खाद्य तेल कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. तेलाच्या किमती कमी करण्यासाठी कस्टम ड्युटी कमी केली आहे. केंद्र सरकारने कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील मूलभूत कस्टम ड्युटी निम्म्याने कमी केली आहे. पूर्वी या तेलांवर २० टक्के शुल्क आकारले जात होते, जे आता १० टक्के करण्यात आले आहे.
शुक्रवारी या संदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली. हा बदल 31 मे पासून लागू असणार आहे. भारत आपल्या देशांतर्गत खाद्यतेलाच्या गरजेच्या ५० टक्क्यांहून अधिक आयात करतो. ही आयात इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसारख्या देशातून पाम तेलच्या माध्यमातून होते. तसेच अर्जेंटीना, ब्राझील, रशिया आणि यूक्रेनकडून सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात केली जाते.
सरकारने करात कपात केल्यामुळे आता खाद्यतेलाच्या किंमती कमी होणार आहे.याआधी, सरकारने कच्चे पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमा शुल्क २० टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत खाली आणले होते. आता नवीन निर्णयामुळे तिन्ही प्रकारच्या तेलांवरील एकूण आयात शुल्क २७.५ टक्क्यांवरून १६.५ टक्के होईल. कारण त्यावर भारताच्या कृषी पायाभूत सुविधा आणि विकास सेस आणि समाज कल्याण अधिभारदेखील आकारला जातो.
सप्टेंबर २०२४ मध्ये केंद्राने कच्च्या आणि रिफाईंड केलेल्या वनस्पती तेलांवर २० टक्के मूलभूत सीमाशुल्क लागू केले होते. यानंतर, कच्चे पाम तेल, सोया तेल आणि सूर्यफूल तेलावर २७.५ टक्के आयात शुल्क लागू करण्यात आले. जे त्यापूर्वी ५.५ टक्के होते. तर तिन्ही तेलांच्या रिफाईंड ग्रेडवर आता ३५.७५ टक्के आयात कर आकारला जातो.