नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकच्या बागलाण तालुक्यातील मुंगसे येथून अपघाताची मोठी बातमी समोर आलीय. ज्यात वीटभट्टीवर डंपरने चिरडल्याने मजुराच्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ईश्वर पुया कोकणी (वय १७) आणि काळू पुया कोकळी (वय १३) असं मृत मुलांची नाव असून याप्रकरणी जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बागलाण तालुक्यातील मुंगसे येथील महेश जगदाळे यांच्या वीटभट्टीवर नाना कोळी (४५, रा. सांगवी, ता. शिरपूर) हे मजूर म्हणून कामास आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वीटभट्टीजवळ खाटेवर येथे काम करणाऱ्या एका मजुराची ईश्वर आणि काळू ही दोन मुले झोपली होती. भरधाव वेगात रिव्हर्स घेणाऱ्या हायवाने (एमएच ४१ एटी ७१७२) खाटेवर झोपलेल्या या दोन भावांना चिरडले. यात दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला.
त्यापैकी एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला नाशिक येथे नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. नाना कोळी यांच्या फिर्यादीवरून जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी हायवाचा संशयित चालक धनंजय जाधव (रा मुंजवाड, ता सटाणा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.