नाशिक लाईव्ह न्यूज । ९ मे २०२५ । भारत-पाकिस्तानातील युद्धजन्य स्थितीपूर्वी भारताने पाकिस्तानच्या सीमा बंद केल्या. याला आता आठवडा झाल्याने परिणामी अफगाणिस्तानातून भारतात येणारा सुकामेवा महागला आहे. काळा मणुका, अंजीर, किसमीस, खजूर यांच्या दरात तब्बल दीडशे ते दोनशे रुपयांनी प्रति किलोसाठी वाढ झाली आहे. हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अफगाणिस्तानातून भारतात काळा मणुका, अंजीर, किसमिस, अक्रोड, खजूर तर व्हिएतनाममधून काजू आयात होतो. युद्धस्थिती, सीमाबंदीमुळे अफगाणिस्तानातून आयात बंदी झाली आहे. दुसऱ्या मार्गाने हा माल आणायचा म्हटला तरी त्याची वाहतूक महागणार आहे. त्यामुळे सुकामेव्याचे दर वाढले आहेत. तर व्हिएतनामने काजूच्या निर्यातीवर बंदी आणली आहे.
यामुळे किरकोळ बाजारात काजू ७० रुपये काळा मणुका ५० रुपये किसमिस १०० तर अंजीर १५० रुपयांनी किलोमागे महागले आहेत. नाशिकसह सातारा परिसरात किसमिस तयार होतो, मात्र यंदा त्याचे उत्पादन अत्यल्प असल्याने त्याचाही फटका दरवाढीच्या रूपाने व्यावसायिक पर्यायाने ग्राहकांना बसतो आहे.
अशी झाली दरवाढ
काजु – मागील महिन्यात- ९८०… आजचे दर- १०५०
अंजीर : मागील महिन्यात- १४५०… आजचे दर १६००
काळा मणुका : मागील महिन्यात- ४५०… आजचे दर ५००
किसमिस : मागील महिन्यात-२५०… आजचे दर ३५०
बदाम : मागील महिन्यात- ८८०… आजचे दर ८८०