नाशिक लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२५ । राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीटीत उभे पिके भुईसपाट होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरावून घेतला आहे. दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील ३० गावांमधील १९९० शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली आहेत.
एकूण १२९७ हेक्टरवरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागांना दिला आहे. सर्वाधिक नुकसान ११७५ हेक्टरवरील कांद्याचं झालं असून त्यापैकी ११०० हेक्टरवरील नुकसान एकट्या सटाणा तालुक्यातील आहे. बागलाणमध्ये १८ गावांमधील १७०० शेतकऱ्यांच्या ११५५ हेक्टरवरील पिक आडवी झाली आहेत.
ऐन काढणीला आलेला कांदा अवकाळीमुळे हातचा गेला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालंय. याशिवाय १० हेक्टरवरील गहू, ६० हेक्टरवरील भाजीपाला, २० हेक्टरवरील डाळिंब, २० हेक्टरवरील द्राक्ष पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे केले जाणारा असून त्यानंतर शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलीय.