नाशिक लाईव्ह न्यूज । राज्यासह नाशिक जिल्ह्यात थंडी गायब होऊन तापमान वाढू लागल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. परिणामी कांदा पिकासह फळबागांना फटका बसू लागला आहे. यात प्रामुख्याने कांद्याचे नुकसान होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे.
मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी चार महिने सतत पडलेल्या पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाली, परिणामी लागवड लांबली. याचा परिणाम उत्पादनावर होणार असून, आधीच कमी झालेले उत्पादन वाढत्या तापमानामुळे अधिकच घटण्याची शक्यता आहे. कांद्याच्या वाढीसाठी थंड हवामान आवश्यक असते. मात्र, जानेवारीपासूनच उन्हाचा तीव्र प्रभाव वाढल्याने कांदा रोपांची वाढ थांबली आहे. रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर करूनही समाधानकारक वाढ होत नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कांदा पिकातून समाधानकारक उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी गहू आणि भाजीपाला लागवड करण्याचा पर्याय निवडला. मात्र, गव्हाच्या उत्पादनातून ही अपेक्षित नफा होणार नाही. पाण्याची पातळी कमी झाल्याने इतर पिकांची लागवडही अडचणीत आली आहे.
वाढलेला उत्पादन खर्च
बहुतांश शेतकरी दूध उत्पादनाच्या माध्यमातून अर्थकारण सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांचे वाढलेले उत्पादन खर्च आणि घटलेले उत्पन्न लक्षात घेता, राज्य शासनाने तातडीने विचार केला पाहिजे, अशी मागणी होत आहे. अन्यथा, शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.